माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

रविवार, १९ जानेवारी, २०२५

 

अतरंगी पोर

 


जशी सगळीकडे असतात तशी चाळीमध्ये सुद्धा तरंगी पोरांची काही कमी नव्हती.  तसं या पोरांचं अभ्यासात लक्ष कमी आणि उडानटप्पूपणा करण्याकडे जास्त ओढा.  चाळीमध्ये तसाही पोरांना आई-वडिलांचा फारसा धाक नसायचा आणि ह्या अतरंगी पोरांना तर नव्हताच नव्हता.

 

चाळीत पाळलेल्या कोंबड्या खुडूक झाल्या म्हणजे अंडे देईनाशा झाल्या की त्यांच्या पायाला एक दोरी बांधायची व त्या दोरीला एखादा पत्र्याचा डबा बांधायचा.  कोंबडीला द्यायचं सोडून.  मग कोंबडी धावत पुढे आणि मागून तो आवाज करणारा डबा. त्या आवाजाने कोंबडी आणखीन घाबरायची व आणखीन जोराने पळत सुटायची.  तिच्यामागे सारी अतरंगी पोरं लागायची.

 

आमची वस्ती खाडीला लागून होती.  त्यावेळी भूमिगत गटार नव्हती.  जी गटार होती ती उघडीच होती.  पावसाळ्यात त्यात पाणी साठायचं  आणि त्या पाण्यातबहुदा खाडीतून असेलछोटे छोटे मासे यायचे.  मे महिन्यामध्ये बांबूच्या टोपल्या मधून आंबे विकले जायचे. त्या टोपल्या अशा वेळी उपयोगी पडायच्या.  ही अतरंगी पोरं या टोपल्यानी गटारातले मासे पकडायची. त्यावेळी फारसं काही कळत नव्हतं.  माशांना चांगलं पाणी लागतंचांगलं अन्न लागतं आणि त्याहून जास्त म्हणजे हवा लागते. पोरं हे पकडलेले मासे छोट्या छोट्या काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवायची.  गटारातलं पाणी गढूळ असायचं म्हणून बाटलीत नळाच शुद्ध पाणी भरलं जायचं.  खरं बघता या शुद्ध पाण्यात क्लोरीन असायच.  त्यामुळे मासे लवकर मरायचे.  पोराना कळतच नव्हतं.  ज्यांना थोडीफार अक्कल होती ते गटाराच्या पाण्यातच माशांना ठेवायचे पण त्यांना खायला घरातला भात घालायचे.  एक दोन दिवसांनी हा भात आतमध्ये सडायचा  व मासे मरायचे.

 

परंतु काही मुलं हुशार होती.  पावसाळ्याच्या दिवसात ते बाहेर परात ठेवत.  पावसाचं परातीत जमलेले पाणी शुद्ध असायचं.  ते पाणी, ती मुलं माशांना पाळण्यासाठी वापरायचे.  त्यामुळे मासे थोडे जास्त दिवस जगत.

 

आधी प्राणी संग्रहालय या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे चाळीत  काही जणांनी कोंबड्या पाळल्या होत्या.  आमच्या चाळीतला एक पोरगा सकाळी  खूप लवकर उठायचा  व कोंबड्यांच्या खुराड्यातील अंडी चोरायचा.  हा प्रकार बरेच दिवस चालला होता.  पण एकदा त्याला रंगेहात पकडला.  त्या दिवसापासून चाळकऱ्यांनी त्याचं नाव 'अंड्या' म्हणून ठेवून दिलं.

 

छोट्या-मोठ्या चोऱ्या करणं यात या अतरंगी पोरांना थ्रील वाटायचं.  केळीवाला, फळवाला जिन्यातून वरून खाली उतरत असताना त्याच्या डोक्यावर जी टोपली असायची त्यातून फळ चोरण्यामध्ये  काही जणांचा हातखंडा होता.  एकदा एका केळीवाल्याच्या टोपलीत केळीचा फक्त एक घड उरला होता.  म्हणजे साधारण एक डझन केळी उरली होती.  एका अतरंगी पोराने ती वरच्यावर उचलल्यानंतर त्या केळीवाल्याचं डोक्यावरच वजन एकदम हलकं झालं आणि त्या अतरंगी पोराची चोरी पकडली गेली. 

 

चाळीमध्ये लग्न होऊन नव्यानेच चाळीत प्रवेश करणाऱ्या नववधूच्या किंवा हॉस्पिटलमध्ये जन्माला येऊन प्रथमच चाळीत येणाऱ्या बाळाच्या अंगावरून काही जण नारळ उतरवत असत.  हा उतरवलेला नारळ फोडून बाजूला फेकून देत असत.  हे नारळ बिनधास्त खाणारी पोरं हीच खरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्यावेळचे कार्यकर्ते होते.  एवढेच कशाला, लहान बाळांना दृष्ट लागू नये म्हणून दर शनिवारी आपल्या पोरांवर लिंबू फिरवून ते चाळीच्या बाहेर टाकून देण्याची  काही जणांची प्रथा होती.  आमच्या चाळीतली काही पोरं तर ही लिंब पण उचलायची व त्याचे लिंबू सरबत करून प्यायची.

 

चोर-पोलीस खेळत असताना किंवा लपाछपी खेळत असताना चाळीच्या गच्चीवर जाऊन आऊट होऊ नये म्हणून तिसऱ्या माळ्यावरून पाण्याच्या पाईपच्या सहाय्याने खाली उतरणारी मुलं तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहेत.  त्यावेळी त्याचं काही फारसं वाटायचं नाही.  पण आता ज्यावेळी विचार करतो त्यावेळी ते किती अनसेफ होतं हे लक्षात आल्यावर अंगावर काटा उभा राहतो.

 

.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा