माझ्या चाळीची गोष्ट

माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

 

जेवणाचा प्रश्न सुटला






मी माटुंगा येथील रामनारायण रुईया कॉलेजमध्ये प्रथम वर्ष विज्ञानाला प्रवेश घेतला व माझं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं. सकाळी आठ वाजता प्रात्यक्षिके सुरू व्हायची आणि र्ग संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालायचे. कॉलेजला वेळेवर पोहोचायचं म्हणजे सकाळी सात वाजताच घराबाहेर पडाव लागायच. इतक्या सकाळी-सकाळी घरी नाश्ता होणं आणि सोबत डबा मिळणं कठीण होत. त्यासाठी घरच्यांना विशेषता म्हाताऱ्या आईला त्रास देण जीवावर यायच. त्यामुळे उपाशी पोटीच कॉलेज गाठायचं आणि संध्याकाळी चार वाजता कॉलेज संपल्यानंतर कधी एकदा घर गाठतो आणि जेवतो असं व्हायचं. अनेक वेळा तर भूक एवढी असह्य व्हायची की शेवटच्या तासाला दांडी मारून लवकर घरी पळावे लागायच.

 

अशा तीन-चार दांड्या झाल्यानंतर माझी तक्रार कॉलेजचे प्राचार्य आर.. कुलकर्णी सरांकडे करण्यात आली. त्यांनी मला चौकशीला बोलावलं. मी सांगितलेल कारण बहुतेक त्यांना पटल असावं. त्यांनी लगेच मला रुईया कॉलेजने गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या स्टुडंट्स म्युच्युअल एड फंड चे अध्यक्ष असलेले उपप्राचार्य शाहूराजा सरांना भेटायला सांगितल. डोक्यावर केस नसलेले, गोल चेहऱ्याचे, गोरेपान प्रो. शाहूराजा यांचे व्यक्तिमत्व अतिशय देखण व भारदस्त होत. माझी अडचण समजून घेऊन त्यांनी त्या दिवसापासून मला एक रुपया चाळीस पैशाची कॉलेज कँटीनची कुपन दररोज देण्याची व्यवस्था केली. या 'कुपन' मुळे माझा दुपारच्या जेवणाचा प्रश्न सुटला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा